मुंबईः प्रतिनिधी
भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कि येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल परंतु आम्हाला सरकारकडून कोणतीही हालचाल किंवा सकारात्मक कृती दिसत नाही. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला जी तोंडी व लेखी आश्वासने दिली होती ती फसवी निघालेली आहेत, म्हणून आम्ही सरकारला आज पत्रकार परिषदेतून इशारा देत आहोत कि १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर २५ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्रातील २८८ आमदार आणि ४८ खासदार आणि राज्यसभेचे खासदार व विधान परिषदेचे आमदार यांच्या घरासमोर शांतपणे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी दिला.
मुंबई पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सर्व आमदार आणि खासदारांना सूचना आहे कि त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखांशी बोलून व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे. मग ते आमदार आणि खासदार कोणत्याही पक्षाचे असतील, त्यांनी ताबडतोब ठोस निर्णय घ्यावा, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा. त्यांनी आमच्याशी कटिबद्ध राहावे, अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू. संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे एकच आंदोलन असेल. हे राज्यव्यापी आंदोलन शांतपणे ठिय्या आंदोलन राहणार असल्याचे सांगत आम्ही आमच्या आंदोलकांना आचारसंहिता आखून देणार आहोत. परंतु या आंदोलना व्यतिरिक्त जर दुसरे जो कोणी आंदोलन जाहीर करेल त्यांना मराठा समाजाचा हिसका दाखवू असा सूचक इशारा त्यांनी दिला.
भाजप सरकारशी खूप चर्चा, निवेदने आणि बैठका झाल्या आता सरकारशी कोणतीही चर्चा नाही, सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या पुढच्या मोठ्या आणि तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल. आमच्या पुढच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी तसेच धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या पुढील आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर असेल. आम्ही धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाज आंदोलनासाठी पुन्हा एकदा तयार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर एकच मोठे आंदोलन होणार आहे, अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.
पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर बैठका आणि पत्रकार परिषद घेत आहोत. महाराष्ट्रात फिरताना असे दिसून येत आहे कि संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना पाणी नाही, जनावरांना चारा नाही आहे, म्हणून आमची मागणी आहे कि सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा. मराठा समाजासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत कि सरकारने मराठा आरक्षण ताबडतोब जाहीर करावे, आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, कोपर्डी प्रकरणाचा निर्णय घ्या, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या, महिलांना संरक्षण द्या, अशी माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली.
Tags bjp congress maratha kranti morcha mla and mlc mp ncp shivsena
Check Also
एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे
केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …