Breaking News

मंत्र्याचा मुलगाच करतोय शासकिय बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी भूखंडाचे श्रीखंड प्रकरणातही शिवसेनेचा मंत्री

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शिवसेना अडचणीत आली असतानाच आता याच पक्षाचा आणखी एक ज्येष्ठ मंत्री भूखंडाचे श्रीखंड खाण्याच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानेच एका खाजगी कंपनीच्या नावाखाली सरकारी बंगल्यात बसून “भूषणा” वह कामगिरी सुरू केल्याची चर्चा सध्या मंत्रालयात जोरात सुरु आहे.

महाराष्ट्रात “उद्योग” वाढावेत यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी राज्यातील १७ एमआयडीच्या विस्तारीकरणाची योजना सरकारने आखली आहे. या विस्तारीकरणासाठी एमआयडीसी आणि उद्योगांना जमिनी लागणार आहेत. त्यासाठी सध्याच्या एमआयडीसीला लागून असलेली मोकळी जमिन किंवा त्याच जिल्ह्यात इतरत्र असलेली मोकळी जमिन मिळविण्याचे प्रयत्न एमआयडीसीकडून सुरु आहेत. मात्र या “उद्योगा” साठी लागणाऱ्या जमिनी ज्येष्ठ मंत्र्याच्या सरकारी बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी करणाऱ्या पुत्राच्या इंग्रजी नाव असलेल्या कंपनीकडूनच खरेदी कराव्या असा अलिखित दंडक एमआयडीसीबरोबर उद्योजकांना ज्येष्ठ मंत्र्याने घातल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील ६ महिन्यात सदर कंपनीने एमआयडीसी आणि उद्योजकांना शेकडो एकर जमिनी वाढीव दराने विकण्यात आल्या आहेत. सदर भूषणावह सुपुत्राकडून सदरच्या जमिनी शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात येतात आणि त्यात ५० लाखाची रक्कम जोडून त्या उद्योग आणि एमआयडीसींना विकण्यात येत आहेत. तसेच मुंबई उपनगरात भिवंडी ते पालघर या दरम्यान तब्बल एक हजार जमिन या कंपनीने विकत घेतली असून सध्या टिटवाळा येथेही राज्य सरकारच्या एमआयडीसीला किमान दिड कोटी रूपयांना एकरी किंमतीने विकरण्यासाठी किमान ५०० एकर जमिन शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

मंत्र्याच्या या “भूषणा”वह कामगिरीमुळे शासकिय कामासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणाचे काम जरी कमी होणार असले तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार शेतकरी किंवा शेत जमिन मालकास मिळणाऱ्या तीन पट फायद्यापासून फायद्यापासून रहावे लागणार आहे. मात्र या जमिन खरेदी पोटी सरकारला अनावश्यक जास्तीची रक्कमही त्यांना द्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर मंत्र्याच्या “भूषणा” वह कामगिरी करणाऱ्या मुलावर कोकणातील नाणार प्रकल्पातील जमिनप्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते. तसेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील जेएसडब्लू अर्थात जिंदाल ग्रुपच्या कंपनीच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर जमिन लागणार आहे. त्यासाठी मूळची एमआयडीसी बंद अवस्थेत असताना जिंदालसाठी शेकडो हेक्टर जमिन कंपनीच्या सोयीसाठी नव्याने उपलब्ध करून देवून त्या परीसरात एमआयडीसी वसविण्याचे काम सध्या या ज्येष्ठ मंत्र्याकडून सुरु आहेत. त्यासाठी या “भूषणा” वह कामगिरी करणारा मुलगा जमिन खरेदीसाठी पुढाकार घेतल्याची माहितीही रत्नागिरीतून पुढे आली आहे.

यासंदर्भात मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा देत सदर मुलाचा सरकारी कामात हस्तक्षेप वाढला असून या हस्तक्षेपामुळे उद्योग विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आणि प्रधान सचिवांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *