शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण रोवल्यामुळे सांसदीय राजकारणात आणि कायद्यातील तरतूंदीबाबत काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या राजकिय लढाईवर लवकर निकाल लागून कायद्यातील तरतूंदीचा नव्याने अर्थ आणि सासंदीय राजकारणात निर्माण झालेला पेच याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र आता तिसऱ्यांदा याप्रकरणातील सुनावणी प्रकरणी तारीख पुढे ढकलेली आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी ८ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याची तारीख न्यायालयाने जाहिर केली. मात्र ८ ऑगस्टला काही दिवसांचा अवधी राहिला असतानाच न्यायालयाने ८ ऑगस्टची सुनावणी १२ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहिर केले. आता तिसऱ्यांदा ही सुनावणी १२ ऑगस्टहून तब्बल एक महिना पुढे ढकलत २२ ऑगस्टला ही सुनावणी घेणार येण्यात येत असल्याचे न्यायालायकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी तब्बल दहा दिवसांनी लांबवणीवर पडली असून पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षादरम्यान आलेली ही सर्वात मोठी बातमी समजली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू होती.
२६ ऑगस्ट रोजी ते निवृत्त होणार असल्याने त्यांच्याकडे केवळ चारच दिवस बाकी आहेत. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा वेगळ्या घटनापीठाकडे वर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरन्यायाधीश रमणा यांनी आतापर्यंत घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कडक निरीक्षणं नोंदवली होती. मात्र आता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या चार दिवसात या प्रकरणावर ते नेमका कोणता निर्णय देणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.