मागील दोन तीन महिन्यापासून राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आणि शेतजमीन खरवडून गेल्याचे तर उभ्या पिकात पाणी शिरल्याचे चित्र आजही पाह्यला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदत दिली जाणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट आणि दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे जाहिर केले.
त्याचबरोबर सध्या एनडीआरएफची किती मदत मिळते याबाबत विचारले असता ते म्हणाले, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ६८०० रूपये मिळतात. मात्र आम्ही त्यापेक्षा दुप्पट मदत करणार असल्याचे स्पष्ट केले.
परंतु राज्याच्या अनेक भागात पाऊसाचे थैमान अद्यपही सुरुच आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात अडचणी येणार आहेत. त्याचबरोबर हे पंचनामे कधी पर्यत पूर्ण करायचे याचे कोणतेही आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले नाहीत की, त्यासंदर्भात आदेश जारी करणार याबाबत कोणतीही स्पष्टता केली नाही.
त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळणार याबाबत अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक
राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.