नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कोल्हापूरात झालेल्या जाहिर सभेत बोलताना आगामी निवडणूकीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, राहुल गांधी यांची काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित, समाजवादी पार्टी आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे सर्वजण भाजपाच्या विरोधात एकत्रित येतील तरीही आपल्याला लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा जिंकायच्या असून विधानसभेत पूर्ण बहुमताने भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा निवडूण द्यायचे असल्याचे आवाहन केले. अमित शाह यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, अमित शाह यांनी माझे नाव विरोधक म्हणून नाव घेतले ही चांगली गोष्ट आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला कधी कळणार याची वाट पहात असल्याचा टोलाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लगावला.
अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील आगामी निवडणूकांच्या दृष्टीकोनातून आमची उध्दव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती झालेली आहे. पिंपरी-चिंचवड पोट निवडणूकीसाठी आम्हाला महाविकास आघाडीतील कोणीही विचारले नाही. त्यामुळे आम्ही रमेश कलाटे यांना पाठिंबा दिला. मात्र कसबा पेठ येथील निवडणूकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणी विचारणा केली नाही. त्यामुळे तेथे वंचितचा उमेदवार देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा उल्लेख मोगॅंम्बो असा केला होता. यावर प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता म्हणाले, राजकारणात अशी टोपण नावं पडतातच. अशी नाव राजकारण्यांनी स्वीकारली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तरच राजकारणातला खेळतेपणा राहतो. नाहीतर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको, अशी उपरोधिक टीपण्णीही केली.
यावेळी शिंदे-ठाकरे वादात तुम्ही मध्यस्थी करणार का? असं विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, याप्रकरणात मी़ मध्यस्थी करणार नाही. ज्याचं भांडण त्याने मिटवावं, असं स्पष्ट करत पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना, विधान परिषदे प्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाचा पराभव होईल, अशी शक्यता व्यक्त केली.