कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका मांडली. मात्र मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीत सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचे ठरले. मात्र दुसरा आठवडा सुरु झाला तरी अद्याप ठराव का आणला जात नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्नी करण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करावी अशी मागणी करत कामकाजात सहभाग नोंदविला. त्यावेळी प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून आधी सीमावादाप्रश्नी ठरविण्यात आल्याप्रमाणे ठराव चर्चेस आणावा अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सरकारची भूमिका स्पष्ट करतील असे सांगत आपलं ठरलं आहे हा विषय उद्या घ्यायचा म्हणून. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले. मात्र काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला विषयावर बोलायचे आहे त्यामुळे संधी मिळावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. असे सांगत संधी नाकारली. त्यावर विरोधकांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच अध्यक्ष जाणीवपूर्वक विरोधकांना बोलू देत नाहीत असा आरोप करायला सुरुवात केली.
अखेर फडणवीस यांनीच पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना बोलायची संधी अपवाद म्हणून दिली पाहिजे असे सांगत स्वतः खाली बसले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनीही कर्नाटक राज्याकडून सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडण्यात येत आहे. मात्र आपल्या राज्य सरकारकडून कोणतीच ठाम भूमिका मांडली जात नाही की कर्नाटकला सडेतोड उत्तर दिले जात नाही. त्यामुळे सीमावादप्रश्नी ठराव आजच आणून त्यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली.
त्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे बिनधास्त विधाने करतात. मात्र आपले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खाली मान घालून गप्प बसतात असा आरोप करत आपल्याही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. सीमाप्रश्नी ठराव आणून सीमावर्ती भागातील नागरीकांच्या पाठीशी आपण आहोत हे दाखवून द्यायला पाहिजे असे सांगत आजच तो ठराव चर्चेला आणून मंजूर करावा अशी मागणी केली.
त्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुरू गोविंद सिंग यांचे दोन्ही मुले शहीद झाले. तो कार्यक्रम नांदेडमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आपले मुख्यमंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. त्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे ते जर लवकर आले तर आजच ठराव मांडू नसेल तर उद्या हा ठराव मांडू असे आश्वासन सभागृहाला दिले.