केंद्र सरकारने आपले बिघडलेले आर्थिक गणित सुधारण्याच्या उद्दिष्टासाठी सुट्या अन्नधान्यावर आणि जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जसा व्यापाऱ्यांना बसणार आहे तसा तो सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. परिणामी या जीएसटी कराची वसुली व्यापारी ग्राहकांकडूनच करणार असल्याने महागाईत आणखी वाढ होऊन सर्वसामान्य जनतेच्या खिशावर त्याचा भर पडणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारला गर्भित इशारा दिला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी मिठावर कर आकारल्यानंतर भारतातून ब्रिटिशांची राजवट संपण्याची सुरुवात झाली होती, आता भाजपा सरकारने अन्नधान्यावर जीएसटी आकारल्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते असा गर्भित इशारा दिला.
पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल यांच्यासह स्टील, सिमेंटच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. हे कमी म्हणून की काय आता केंद्रातील भाजपा सरकारने विविध जीवनावश्यक वस्तूनंतर आता अन्नधान्यावर देखील पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आधीच खते, कपडे, कोळसा, जीवनावश्यक औषधे आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांची पाठ मोडून गेली आहे, त्यात आता अन्नधान्यावर जीएसटी लावल्याने नागरिकांच्या पोटावरदेखील पाय मारण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे असा संतापही त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला.
दरम्यान, आज महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या या जीएसटी कराच्या विरोधात बाजार बंद ठेवून निदर्शने केली. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्येही तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत केंद्राच्या विरोधात निदर्शने केली.
ब्रिटिशांनी मिठावर कर लावल्यानंतर भारतातून ब्रिटिशांची राजवट संपण्याची सुरुवात झाली होती, आता भाजपा सरकारने अन्नधान्यावर जीएसटी लावल्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 16, 2022