राज्यात भाजपाला पराभूत करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमुलच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली. मात्र एमआयएमच्या या ऑफरला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी झिडकारले असून औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यांसोबत युती नाही असे निक्षून सांगितले.
तसेच एमआयएम ही भाजपाची टीम असल्याने त्यांना महाविकास आघाडी सोबत घेणार नसल्याचे भूमिका स्पष्ट केली.
तर महाविकास आघाडीचे २५ आमदार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते असा दावा करणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत राऊत म्हणाले की, तुमचेचे ५० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार करत पुढे बोलताना म्हणाले जर आमचे २५ आमदार तुमच्या संपर्कात आहेत तर थांबलात का? जा ना पुढे. सरकार स्थापन करा असे आव्हान दिले.
दानवे हे माझे चांगले मित्र आहेत. दिल्लीत माझ्या शेजारीच राहतात. पण लोक धुळवडीला भांग पितात अशी परंपरा आहे. पण रावसाहेब दानवे भांग पितात अशी माहिती माझ्याकडे नाही. रावसाहेब दानवे भांग पित नाहीत. त्यांना कुठलीही नशा करण्याची आवश्यकता पडलेली नाही. तरीपण ते असे धुळवडीला कोणत्या नशेमध्ये बोलले मला माहिती नाही. ते २५ बोलले आहेत पण त्यांना महाविकास आघाडीचे १७५ आमदार आमच्या संपर्कात आहे म्हणायचे असेल. त्यांची जीभ घसरली असेल. असे असेल तर मग आमदार घ्या आणि कोणासाठी थांबला आहात. तुमचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत असे म्हटले तर तुम्ही काय म्हणणार आहात? असा सवाल करत नव्हे आहेतच अशी उपरोधिक टोला त्यांनी दानवे यांना लगावला.
पण आता होळी संपल्याने रात्री नशा उतरली असेल. काल आपण काय बोललो ते त्यांना आठवणार नाही खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री दानवे काल धुळवड साजरी करताना म्हणाले होते की, महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.