२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत करायचेय ना? तर मग या आपण युती करू असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. सध्या राज्यात एमआयएमचा एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार आहे. तसेच अनेक ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारामुळे काही ठिकाणी काँग्रेसची तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या जागा कमी आल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इम्तियाझ जलिल यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळीही त्यांना हा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जलील यांनी राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसलाही युती करण्याचे आवाहन केले असून आम्ही कुणालाही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसने, आपण युती करु.
सर्वात जास्त कुणी देशाचे नुकसान करत असेल, तर ती भाजपा आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही लागते, ते आम्ही करायला तयार आहोत. उत्तर प्रदेशातही सपा, बसपासोबत आम्ही बोलणी केली होती. पण त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत, पण एमआयएम पक्ष नको. म्हणून मी ही ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले.
एमआयएमच्या इम्तियाझ जलिल यांच्या या नव्या प्रस्तावामुळे राज्यात नव्या सत्ता समीकरणांची चर्चा सुरु झाली असून जलिल यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अद्यापही या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.