राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित असलेले जनमत निर्माण करण्यात शिंदे हे कमी पडत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या त्या गौप्यस्फोटावर खोचक टोला लगावत म्हणाले, संजय राऊत यांना काय झालेय कळायला मार्ग नाही. मात्र त्यांना दिल्लीत घडणाऱ्या घटना इथे बसल्याठिकाणी समजायला लागल्याने ते अंर्तयामी झालेत का? असा खोचक सवाल केला.
शंभुराजे देसाई म्हणाले, मला एक कळत नाही की, संजय राऊत आमच्या महायुतीमध्ये काय सुरू आहे हे कसं सांगू शकतात. संजय राऊत अंतरयामी झाले आहेत का? रोज सकाळी उठायचं, तथ्यहीन बोलायचं. मला त्यांना एकच सांगायचं आहे की, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ असं आहे अशी टीका केली.
पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, कालच शरद पवार म्हणाले की, २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही हे सांगू शकत नाही. ज्यांनी मविआ स्थापन केली त्या शरद पवारांनीच हे एवढं मोठं वक्तव्य केलं आहे. यावरून मविआत सगळं आलबेल नाही हे दाखवतं आहे. याबाबत संजय राऊत काही बोलत नाहीत, मात्र त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते असं वक्तव्य करत आहेत, असेही सांगितले.
शंभुराजे देसाई पुढे म्हणाले, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचा मुख्यमंत्री बदलणार आहे का असं विचारायला गेले आहेत का? आमचं १७० हून अधिक आमदारांचं बहुमत आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्याची हौस असेल तर त्यांनी सभागृहाच्या कोणत्याही आयुधाचा वापर करून विश्वासदर्शक चाचणीची मागणी करावी. आम्ही दोनदा १७० चं बहुमत दाखवलं आहे, आता आम्ही १८५ च्या पुढे जाऊ. त्यामुळे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंविषयी अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात अर्थ नाही.
संजय राऊत तथ्यहीन, विनाआधार बोलतात. ते ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून’ असं वागत आहेत. पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते बोलले नाहीत, मात्र विश्व प्रवक्ते म्हणाले की, शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. राऊत राष्ट्रवादीच्या भूमिकेवर का बोलत आहेत असा सवालही संजय राऊत यांना केला.