मुंबई : प्रतिनिधी
राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासन दिले आहे. या सरकारलाभ्रष्टाचाराचा डाग लावण्याच्या राजकीय इराद्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमानांबाबत खोटनाटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातया सर्व आरोपांची उत्तरे मिळाली असून सत्याचा विजय झाला आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही कारण त्यांच्याकडे काहीही पुरावेच नव्हते. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी हे खोटेनाटे आरोप केले गेले. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही. आता हिंमत असेल तर राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने संसदेत या विषयावर चर्चा करावी. भाजपा सरकार सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला समर्थ असल्याचे आव्हान त्यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या विकासकामांवर टीका करता येत नसल्याने संरक्षण व्यवस्थेबाबत खोटे आरोप करून राजकीय फायदामिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधी व काँग्रेसने केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधी यांचा खोटेपणा उघड झाला, असाही टोला त्यांनी लगावला.