मराठी ई-बातम्या टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला विसरले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका भाजपाच्या समर्थनार्थ की विरोधात असा संभ्रम निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे प्रतिआव्हान दिले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सागर बंगल्यापासून लांबच बॅरीकेड्स लावत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखले. तर कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून आधीच जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
मात्र या आंदोलनामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोणाच्याही घराबाहेर आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादीची नाराजी स्पष्ट केली. तसेच नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका असल्याचे सूचक विधान ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेत्यांच्या घराबाहेर आंदोलन कऱण्याची घोषणा करण्यात आली होती. ती भूमिका योग्य नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करणं योग्य नाही. हा नवीन पायंडा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी, हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण करण्यासारखं असून हे योग्य नसल्याचा ते म्हणाले.
लोकशाहीत विरोध करणं अधिकार असताना सरकारने, प्रशासनाने, न्यायालयाने निश्चित करुन दिलेली जागा आहे. परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. ही नवीन सुरुवात योग्य नसून यापासून सर्व राजकीय पक्ष, नेत्यांनी फारकत घेतली पाहिजे अशी माझी आणि पक्षाची भूमिका आहे. यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणेवर ताण पडून वेगळी परिस्थिती निर्माण होते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने पक्षांतर्गत बैठक घेऊन अशा प्रकारे आंदोलन नको असा निर्णय घेतला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसच्या आंदोलनावरू नाराजी व्यक्त केल्यानंतर मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हणाले की, मोदींच्या काळात जास्त घोटाळे झाल्याचा आरोप करतते पुढे म्हणाले दोन दिवसांपूर्वी २३ हजार कोटींचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. २०१५ साली याची तक्रार होऊनही सीबीआयने एवढी वर्ष गुन्हा दाखल केला नाही. सीबीआयने याबाबत गो स्लो भूमिका घेतली. मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटींचे घोटाळे झाले. घोटाळे करणारे परदेशात लपून बसतायत, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.