मराठी ई-बातम्या टीम
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांचा साडेतीन नेते असा उल्लेख केल्याने ते साडेतीन नेते नेमके कोणं? यावरून राजकिय वर्तुळाबरोबरच सामाजिकस्तरावरही मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या साडेतीन नेत्यांची नावे आपल्याला माहिती आहेत. पण उद्याचा पेपर आज का फोडू ? असा प्रति सवाल करत याविषयीची उत्सुकता आणखी वाढविली आहे.
पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा भाजपाला संजय राऊत यांनी देत उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यावेळी शिवसेना नाहीतर महाराष्ट्र बोलणार असल्याचे सांगत विरोधकांबरोबरच राष्ट्रीय तपास यंत्रणांनीही ही पत्रकार परिषद आवर्जून पहावे असे आवाहनही त्यांनी केले. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्याचा पेपर आज का फोडू असा प्रति सवाल केल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे.
संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ज्या साडेतीन लोकांबद्दल बोलणार आहेत, ते मला माहीत आहे. परंतु त्यांचा पेपर मी आज का फोडू?. राऊतांनी इशारा दिल्याने आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, ते लोक कोण आहेत हे मला माहिती आहे? पण उद्यापर्यंत जरा सस्पेन्स राहु देत. या साडेतीन शहाण्यांपैकी काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत असा उपरोधिक टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.
मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा असे आव्हानही त्यांनी भाजपाच्या त्या नेत्यांना दिला.