मराठी ई-बातम्या टीम
कोरोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत… गरीबांसोबत उभे राहिले…आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला…नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला संसदेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारमधील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेंसचे कार्यकर्त्ये जबाबदार असल्याचे आरोप करत त्या कार्यकर्त्यांनीच कामगारांना महाराष्ट्रातला कोरोना तुमच्या भागात जावून पसरवा असे सांगत त्यांना मोफत तिकिटे देवून त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्यास मजबूर केल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपावर नवाब मलिक जोरदार प्रत्युत्तर दिले.
जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरल्याचा आरोप करत ते पुढे म्हणाले की, मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले… कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली… तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही.. पहिल्यांदा उत्तरप्रदेश व बिहारचे मजुर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या. परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या त्याचा परिणाम लोकं भोगत असल्याची टीका त्यांनी केली.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारकडून यापूर्वीच काही गोष्टींची खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र अनेक वेळा केंद्र सरकारकडूनच योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे राज्यातील मंत्र्यांकडून अनेक वेळा याबातचे जाहिर वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर काही वेळा महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी लॉकडाऊन काळात मजूरांसाठी लॉकडाऊन काळात रेल्वे सुरु केल्याने केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानल्याचे महाराष्ट्राने पाह्यले असताना मोदींनी थेट महाराष्ट्रावर आरोप केल्याने बंगालनंतर महाराष्ट्र भाजपाच्या अर्थात मोदींच्या हिटलिस्टवर असल्याचे अप्रत्यक्षपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकिय अभ्यासकांमध्ये सुरु आहे.