मुंबई : प्रतिनिधी
मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. ती भूमिका सरकार नक्की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात दिली.
यावेळी मुंबईत सुरू होणा-या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीला देण्यात आला. यावेळी मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते.
मराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्हावे त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती ग्रंथालीने मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार सलग दिड वर्षे पाठपुरवा करून आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात बॅण्डस्टॅण्ड येथे महापालिकेची जागा यासाठी उपलब्ध करून दिली. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे औपचारीक कार्यक्रमात हा करार सुपुर्द करण्यात आला. तसेच यावेळी ग्रंथालीच्या कार्यालयासाठी माहिम टायकलवाडी येथील जागेचा करार ही ग्रंथालीकडे सुपुर्द करण्यात आला.
दोन वर्षापुर्वी मुंबई महापालिकेने अचानक ग्रंथालीला विद्यमान कार्यालयाची जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यावेळी साहित्य वर्तुळात खळबळ उडाली होती. त्याचवेळी तातडीने आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत त्याचा पाठपुरवा केला. त्यानुसार आज नव्या जागेचा करारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथालीला सुपुर्द केला.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ग्रंथाली काम करते आहे. पण दुदैवाने महापालिकेच्या एका निर्णयामुळे त्यांना कार्यालय खाली करण्याचा विषय समोर आला. पण त्या कामी आमदार अॅड आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन हा विषया मार्गी लावला आज त्या जागेचा करार ग्रंथालीकडे सुपुर्द करताना मला आनंद होतो आहे. तसेच आज मराठी भाषेचा गौरव दिन आहे. त्याच दिवशी मराठी भाषेसाठी काम करणा-या विद्यापीठाच्या जागेचा करार ही आपण करतो आहोत. मराठी भाषेचे काम करणा-या उपक्रमाला आवश्यक ती मदत यापुढे सरकारकडून करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह ग्रंथालीचे अध्यक्ष दिनकर गांगल, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कवी डॉ. महेश केळुसकर, सुदेश हिंगलासपुरकर, अरूण जोशी, जेष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, धनंजय गांगल, मोहन खैरे, धनश्री धारप, लतीका भानूशाली, दिलीप चावरे आदींसह आमदार प्रसाद लाड आणि नरेंद्र पवार उपस्थित होते.