देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद रंगला आहे. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.
या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. तसेच, आमची आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल, अशा सर्व्हेची आम्हाला गरज नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात, तेव्हा ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण, महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र, आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की महाविकास आघाडीला ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे. माझं म्हणणं की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे, असा टोमणा खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावरून मुख्यमंत्र्यांना लगावला.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, हा माणूस काहीही बोलतो. बरं झालं प्रकाश आंबेडकरांनी त्यांची जागा दाखवून दिली असा पलटवारही संजय राऊत यांच्यावर केला.