एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला.
इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही राज्यात कायदा व सुव्यस्था बिघडविण्यासाठी बाहेरील राज्यातील व्यक्तींकडून कट आखण्यात आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
Intelligence has received reports that people from other states might come to Maharashtra to disturb the law and order situation in the state: Maharashtra Home Department
— ANI (@ANI) May 3, 2022