हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे. आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजक निर्माण करणे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते.
महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा भाजपानेच उचल्याचे सांगत तोच मुद्दा तेच म्हणत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हनुमान चालिसावरून राणा दांम्पत्याने राज्य सरकारला आव्हान दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवित मी म्हणतो असे जाहीर करत हनुमान चालिसा म्हणून दाखविली. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्याची बाजू घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला.