एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल आणि त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सरकारने आधी सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडण्यासाठी जे काही सुरु आहे त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. सगळं शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतकं हे राज्य मजबूत पायांवर उभं आहे. राज्यातील प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. कोणीही उठतो आणि धमक्या देतो हे करु ते करु तर तसं होणार नाही असा विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त राज ठाकरेंवर निशाणा सांधला
धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही. पण त्यांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत ते अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांना महाराष्ट्रात सत्तेवर येता आलं नाही. त्यांना लोकांनी दूर केलं आहे. त्याचं वैफल्य दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाहीत. त्यांनी समोर येऊन लढलं पाहिजे. सुपारी देऊन लढायचं असेल तर लढावं. त्यातच त्यांचा वेळ जाणार आहे. सरकार सरकारचं काम करत असल्याचा टोलाही त्यांनी अप्रत्यक्ष भाजपाला लगावला.
माणसांना जे वापरण्यासाठी ठेवले जातात त्याला उपवस्त्र म्हणतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर हल्ला करण्यासाठी राजकारणात असे वापर सुरु आहेत. ज्यांची स्वत:ची हिंमत नाही असे बिनहिमतीचे लोक असे छोटे लोक, पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ला करायला लावतात. आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी भाजपा आणि मनसेचे नाव न घेता दिला.
अरे कसला अल्टिमेटम, त्यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जी भूमिका घेतली जाईल ती महाराष्ट्रात घेतली जाईल. राज्यात बेकदायेदशीर कृत्य केलं जाणार नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे एक संयमी आणि सक्षम नेते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच सक्षम आणि मजबूत नेते आहेत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार सगळ्यात अनुभवी नेते आणि प्रशासक आहेत. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात असतील तर ते संभ्रमात आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
फुले विरुद्द टिळक असे वाद कोणी लावत असेल तर तर तेदेखील निरर्थक आहेत. अशाप्रकारे टिळक आणि फुले यांच्याविषयी वाद निर्माण करुन जे वादाला फोडणी घालत आहेत त्यांचे मनसुबे फसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णय घेतले जात नाहीत. एक प्रशासकिय व्यवस्था असते, कायद्याच राज्य म्हटल्यावर अल्टीमेटमवर निर्णय घेतले जात नाही. महागाई १०० दिवसात कमी होईल असा अल्टीमेटम काही जणांनी दिला होता. पण झाली का? असा खोचक सवाल करत मोदी यांचे नाव न घेता टीका केली.