मुंबई : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीची हत्येच्या मुद्यावरून चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार राम कदम बोलायला लागले. त्यावेळी त्यांना तालिकाअध्यक्षांनी बसायला सांगितले. मात्र ते तसेच बोलायला लागल्याने बोलण्यास उभे असलेल्या आमदार जयंतराव पाटील यांनी यांना खाली बसवा यांचं कौतुक उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि केले आहे. त्यामुळे यांना खाली बसवा. कदाचीत यांचा फोन नंबरच घ्यायला हवा आणि त्या वाघिणीने फोन नंबर घेतला नाही म्हणून यांना दु:ख असल्याची कोपरखळी जयंत पाटील यांनी कदम यांना मारली. त्यामुळे खाली बसा. भाजपही तुमचं कौतुक करतंय त्यामुळे तोडच नसल्याची मिश्कील टीकाही त्यांनी केल्याने सभागृहामध्ये एकच हशा उसळला.
तसेच राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे बंदूक घेवून एका बिबटयाच्या मागे पळताना आम्ही बघितले. त्यामुळे हिंसात्मक विचार मंत्रीमहोदयांच्या मनात कसे येतात हे गिरीष महाजन यांनी दाखवून दिले आहे. आमदार अनिल गोटे यांनी इथेच येवून भाजपमध्ये काय परिस्थिती आहे ते सांगितले याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
भावनावश मंत्र्यांनी वाघिणीला मारणे बरे दिसत नाही
वाघिणीच्या हल्ल्यात १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले याचे दु:ख महाराष्ट्राला आहे. त्याचं समर्थन आम्ही करत नाही. त्याचं समर्थन करण्याची कुणाची सभागृहात इच्छा नाही. परंतु आपल्यासारखा कर्तव्यदक्ष…प्रश्नाचं उत्तर देताना सर्वव्यापक उत्तर देणारा…परंतु तुमच्या भावना उफाळून येतात त्या सभागृहामध्ये पाहायलाही मिळतात. अशा भावनावश असणाऱ्या एका मंत्र्याने एका वाघिणीला मारणं बरं दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला.
अवनीला बेशुध्द करुन जेरबंद करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पातील पशुवैदयक मध्य प्रदेशमधून चार हत्ती, दोन पशुवैदयक अधिकारी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एक हत्ती, शीघ्र कृती दल, विशेष व्याघ्र दलातील वनसंरक्षक आणि वनविभागाचे सुमारे दोनशे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वनक्षेत्रामध्ये सुमारे १०० ट्रॅप कॅमेरे आणि ५० प्रेशर-इंप्रेशर पॅड लावण्यात आले होते. वन कर्मचाऱ्यांकडून वाघिणीच्या हालचालींचा सतत मागोवा घेतला जात होता. प्रधान वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत पॅराग्लाडियर, इटालियन कुत्रे,सुंगधीत द्रव्ये आणि थर्मसेलचे ड्रोन यांचा वापर करण्यात आला अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. एवढया मोठया प्रमाणात एवढी मोठी यंत्रणा एका वाघिणीसाठी वापरण्यात आली आणि एवढी यंत्रणा वापरुनही तिला बेशुध्द करुन पकडता आले नाही. शेवटी तिला गोळया घालण्यात आल्या. तुम्ही अर्थमंत्री म्हणून काम करण्यापेक्षा भावनाप्रधान म्हणून जास्त काम करता. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये भावना उत्तुंग आहेत अशा काही खास शैलीतील शब्दांचा माराही त्यांनी यावेळी केला.
अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे असं होवू शकतं. आपणाला गुन्हेगार कोण म्हणत नाही. परंतु आपल्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी आहेत, त्यांचं समाधान करण्याची जबाबदारी आहे. त्यांना मी चांगले ओळखतो. त्यांना सांगलीला प्राणी संग्रहालयातील सिंह मरायला टेकले होते हे कळले. त्यावेळी मनोहर जोशी यांच्यासमोर त्यांनी मला विचारणा केली होती असा किस्सा सांगितला. त्या अतिशय कडक असून त्यांचा गैरसमज काढावा आणि त्या सतत बोलत राहिल्या तर तुम्हाला त्रास होईल आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कुणी बोलले की वेदना फार होतात. तुम्ही कोणतेही स्टेटमेंट सोडत नाही. त्यामुळे त्या तुमच्याबद्दल टोकाच्या बोलल्या आहेत. ती माहिती मी परत सभागृहात देत नाही. आपण एकदा शांतपणे जावून त्यांची भेट घ्यावी. त्यांची समजूत नाही घातली तर अमित शहा यांना भेटा आणि त्यांच्याकडून समाधान झाले नाही. तर नरेंद्र मोदींना भेटा आणि त्यांच्याकडून समाधान करुन घ्या आणि केंद्रातील वाघिणीची समजूत काढा असा सल्लाही त्यांनी यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांना दिला.