काल निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सुनावणी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. विरोधी गटाने १० वर्षांच्या मुलांचे, झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे, गृहिणींचे एफिडेव्हीट दिले आहेत. जिल्ह्यात ३२ जिल्हाध्यक्ष म्हणून एफिडेवीट दिले आहे. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. ज्यांना एफिडेवीट कशासाठी देतो हे ही माहिती नाही असे एफिडेव्हीट दिले आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि निवडणुक आयोग ही बाब लक्षात ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदार कुठे जातात त्याच्या मागे पक्ष जातो असे नाही. तर बहुसंख्य कॅडर कुठे आहे यावर पक्ष अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाने यावर स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे मला वाटत नाही की सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला जाईल. पण दिलाच तर पुढची पायरी आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारमधील काही लोक ओबीसींना चुचकारत आहेत, तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, तुम्ही एका ठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा असे आवाहन केले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. पण मराठा आरक्षणाबाबत काय करणार, ओबीसींचे काय करणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. जे अतिशय महत्वाच्या पदांवर ते दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही, त्यांनी ही बोलले पाहीजे असेही स्पष्ट केले.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर गेला आहे. सरकार इव्हेंट करणायात इतके मशगुल आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. गुंतवणूक महाराष्ट्र यावी यासाठीचे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. बेरोजगारीचा दर १० .९ इतका झाला आहे. यापेक्षा जास्त बेकारी असणार ही जास्त वाईट आहे अशी टीकाही केली.
आज झालेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. कुटुंबाने कुठे भेटावं? काय करावं? याविषयी तुम्ही किंवा मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाविषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावं? याविषयी मी भाष्य करणं उचित नाही असे सांगत पवार काका-पुतण्याभेटीवर बोलण्याचे टाळले.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीच्या बातम्यांना शरद पवारांच्या बहिणीने दुजोरा दिला आहे. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना म्हणाल्या, हे आमच्या कुटुंबाचं स्नेहसंमेलन होतं. दरवर्षी आम्ही सर्वजण एकत्र येतो. आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. आम्ही गप्पागोष्टी करतो, एकमेकांची थट्टा-मस्करी करतो. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार यांच्यासह कुटुंबातले सर्वजण उपस्थित होते.