मागील अडीच वर्षात राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. तसेच या महापालिकांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गेलेले ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, महापालिका निवडणूका कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असे सांगत महापालिकांच्या निवडणूकात इतक्यात होणार नसल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले.
दिवाळी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर आज प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापलिका निवडणुकीचा संभ्रम कायम आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे नीट लक्ष आहे. शेवटच्या पावसापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपयांची मदत केली. गेल्या चार दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. आमचे सरकार मदत करणारे आहे. आम्ही घोषणा केल्यानंतर एक महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केल्याचेही त्यांनी सांगितले.