मुंबई: प्रतिनिधी
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्री पदी राहणे उचित होत नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. तसेच त्यानंतर ते नवी दिल्लीला गेले.
राज्यात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी रूपयांची वसुली करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप पत्राद्वारे केला. तसेच याप्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून कळविले होते. त्यानंतर यासंपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करत परमबीर सिंग यांनी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची सूचना केली. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु उच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्याची सूचना करत त्यांच्या एकूणच कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले.
मात्र अॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल न करता १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा आज स्वत:हून राजीनामा दिला.