मुंबईः प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी प्रयत्न करत युतीधर्माचे पालन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेवरून आपण स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करून खैरे यांच्या विजयासाठी भाजपा नेते – कार्यकर्त्यांशी संपर्क करून पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव या मतदारसंघात उमेदवार आहेत. जाधव यांना मा. प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा असल्याचा गैरसमज काहीजणांनी निर्माण केला होता. मात्र आपण पत्रकार परिषदेत जाहीरपणे पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर भाजपबरोबरच शिवसेनेचेही कार्यकर्त्ये नाराज असल्याची चर्चा निवडणूक काळात सुरु होती. त्यामुळे दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत करण्यासाठी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. मात्र या चर्चेचा परिणाम युती धर्मावर होवून त्याचा फटका आगामी विधानसभेच्या निवडणूकीत होईल या भीतीने भाजपाकडून हा खुलासा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या लढाईचा फायदा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा औरंगाबादेत रंगली आहे.
Tags amim bjp chandrakant khaire harshvardhan jadhav loksabha election-2019 shivsena
Check Also
संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही
आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …