महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना आगामी निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे जाहिर वक्तव्य केले. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गांधी विरूध्द आंबेडकर असा वाद पाह्यला मिळाला.
तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेताना म्हणाले की, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही लगावला.
तुषार गांधी यांची कानउघडणी करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का?
महाविकास आघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना उपस्थित केला.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची टीकाही यावेळी केली.