Breaking News

पडळकर हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काहीजण तारतम्य बाळगत नाहीत अजित सरकारकडून उच्च स्तरीय चौकशीचे आश्वासन

मराठी ई-बातम्या टीम

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पोलिस ठाण्याच्या समोरच काही जमावाकडून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देत या हल्ल्याच्या कटात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप केला.

पोलिसांच्या स्टेशन डायरीत यासंबधीचे उल्लेख करण्यात आले असून संबधितांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्याऐवजी उलट पडळकर यांच्या विरोधातच पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या पोलिस बॉडीगार्डला निलंबित करण्यात आल्याची बाब फडणवीसांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत याप्रकरणी स्थगन प्रस्ताव दाखल करून घेत चर्चा करावी अशी मागणी केली

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, परिषदेत सदस्य असणा-यांनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज असल्याचे आहे. मात्र काही सदस्य बोलताना तारतम्य बाळगत नाहीत. या घटनेबाबत चुकीचे कुणीच समर्थन करणार नाही. मात्र काही लोकांना आपण आमदार आहोत यांचे काही तारतम्य बाळगून वागायला हवे याचे भान राहत नाही. अजित पवार चार दिवसांत राज्य विकून खातील अशी वक्तव्ये हे लोक करतात ज्यांना माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीबाबत माहिती आहे.

त्यानंतर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी वरिष्ठांमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

तर फडणवीस म्हणाले की, याबाबत समाज माध्यमात जी क्लिप आहे ती पाहिली तरी हा हल्ला किती भीषण होता हे लक्षात येते. जीवघेणा कट होता याची कल्पना येते. पोलीस कर्मचारी अधिकारी यावेळी बघ्याच्या भुमिकेत होते, इतकेच नाही तर शुटिंग करत होते. त्यानंतर पडळकर बंधुवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर पुन्हा अजित पवार यांनी राज्य सरकार या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करेल असे सांगत विषयावर पडदा टाकला.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षांकडून फारशी उत्सुकता दाखविण्यात येत नाही. मात्र भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फड़णवीस यांनी याप्रश्नी मुद्दा उपस्थित केल्याने सरकार म्हणून उत्तर देण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *