मार्च महिन्यात झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कालवधीत चार ते पाच वेळा डिनर डिप्लोमॅसीचा अवलंब करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅ़ड नीलम गोऱ्हे यांनी आज भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, प्रविण दरेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात आज प्रवेश केला.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता म्हणाले, आता सर्वजण बाहेर गेले आहेत. सर्वाचे उपचार झाले आहेत. कोणाला पट्टे लावण्यात आले होते. ते सुद्धा निघाले आहेत. आता फिरत आहेत.
नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण आपल्या पद्धतीने अर्थ लावत आहेत. त्यांना समाधान मानू द्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो, असा खुलासाही केला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्याऐवजी आत्मपरिक्षण करावे. त्यांच्यावर ही वेळ का आली आहे ? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असा खोचक सल्ला दिला.
तर या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना आणि भाजपा विचाराने एक आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास मी उपस्थित राहिलो असल्याचे स्पष्ट करत पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, की, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु. त्यांच्या भावना समजून घेऊ, असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.