शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित महाविकास आघाडी सरकारला खाली खचले. त्यानंतर तरीही आपण शिवसेनेतच आहोत असे वांरवार सांगत महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी समझौता करण्यासाठी एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ५० बंडखोर आमदारांकडून प्रयत्न सुरु आहेत.
त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकताच भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहिर केला. आज गुरू पोर्णिमेनिमित्त ठाण्यातील टेंभी येथील आनंद दिघे यांच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर वक्तव्य करत उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला.
भाजपा प्रणित लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना उध्दव ठाकरे यांनी आता पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी याबाबतचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतलेला आहे. अशा प्रकारचे निर्णय त्यांनी अडीच वर्षांपूर्वी घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन केले. त्यानंतर ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये आले होते. येथे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपाचे सरकार असून हे सरकार स्थिर आहे. तसेच हे सरकार योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नसल्याचे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही भेट झाली आहे, ती सदिच्छा भेट होती असेही ते म्हणाले.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुरूपौर्णिमेनिमित्त आज शिवसेना प्रमुख बाळासेहब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांना वंदन केले. या दोघांची शिकवण आचरणात आणून सामान्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, रविंद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.