देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमधील माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात राज्यात सौर ऊर्जा, शेतकऱ्यांना वाटप करण्याचे सौर ऊर्जेचे कृषी पंप यासह अन्य काही योजनांची सुरवात करण्यात आली होती. मात्र २०१९ च्या निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र ऊर्जा विभागाच्या अनेक निर्णयावर माजी ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक वेळा टीका केली. आता पुन्हा राज्यात सत्तांतर होत शिवसेनेच्या ५० बंडखोर आमदार आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले. आता या सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाची बैठक घेत आढावा घेतला आणि काही नव्याने आदेशही दिले.
राज्यात विजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने फडणवीस यांनी दिले.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात २०१८ मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, अपर मुख्य सचिव नियोजन नितिन गद्रे, नगर विकास-2 विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, उर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, मेडाचे महासंचालक रवींद्र जगताप, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा थकीत कृषीपंपाचा मार्च २०२२ पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौर ऊर्जेला प्राधान्य देत, मार्च २०२२ पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावेत, यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि शासनाची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विकेंद्रित सौर निर्मितीतून ४५०० मेगावॅट उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
याशिवाय उपसा सिंचन योजना सुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, तसेच किमान ३० टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. खासगीसोबतच महावितरणने सुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करावे, असेही त्यांनी सांगितले.
आजच्या ऊर्जा विभागाच्या बैठकीला भाजपाचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची आवर्जून उपस्थिती राहिल्याने विद्यमान ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.