विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी आणि विधेयकावरील चर्चा आदी मुद्यावर किती वेळ आमदारांनी बोललं पाहिजे यावरून भाजपाचे योगेश सागर, शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी मत मांडले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपले मत मांडताना उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा करत कंत्राटी मंत्री सध्या असल्याची टीपण्णी केली. त्यास देवेंद्र फडणवीस यांना तसेच खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी भाजपाचे योगेश सागर यांनी औचित्याच्या मुद्यावर आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाही. शिवाय आमदारांनाही प्रश्न उपस्थित करण्यास पुरेसा वेळ दिला जात नसल्याची तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कामकाज आणि विधेयके चर्चेशिवायच मंजूरी देण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच कामकाज सभागृहाचे कामकाज चालविताना प्रत्येक गोष्टीसाठी वेळ निश्चित करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अध्यक्षांवर किती प्रेशर असतं याची माहिती आहे मला. कारण काही काळ मीही त्या खुर्चीवर होतो. औचित्यांच्या मुद्यांना विभागाकडून उत्तरं मिळत नाहीत, दिली जात नाहीत. त्यामुळे आमदारांना प्रश्नांचे समाधान मिळलेच याची काही श्वाश्वती नाही. मात्र यांच्या (देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुली निर्देश करत) कडे काय पोलिस भरतीही कंत्राटी होते. त्यामुळे यांच्याकडे सध्या उत्तर द्यायलाही मंत्री कंत्राटावर आहेत असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत सर्व आमदारांच्या प्रश्नाला न्याय आणि प्रश्न मांडण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे अशी मागणी केली.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ नाना पटोले यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देताना म्हणाले, आमच्याकडे कंत्राटी मंत्री कोणी नाही तुम्ही येत असाल तर त्याबाबत नक्की विचार करू असे प्रत्युत्तर दिले.
तसेच कंत्राटी पोलिसवरून मला सविस्तर निवेदन करायचेच आहे. मात्र ते निवेदन नंतर करेन असे सांगितले.