Breaking News

भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा आणि बेगडी देशप्रेमाचा पर्दाफाश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

मुंबई : प्रतिनिधी

दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल करून जराही लाज असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

गांधीभवन येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करून सचिन सावंत आणि नवाब मलिक यांनी शहीदांच्या नावाचा वापर करून राजकारण करणा-या भाजपचा खरा चेहरा उघडा पाडला.

या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो,उपस्थित होते.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहीदांचा अवमान आहे. शहीदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणा-या पंतप्रधान मोदी आणि भाजपने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

करकरे परिवाराने आपला कुटुंबप्रमुख गमावला त्याचे दुःख पचवताना एकच प्रामाणिक अपेक्षा ठेवली की आपल्या कुटुंबाच्या बलिदानाचा देशातील जनता आदर राखेल परंतु या भावनेलाच भाजपने बाधा पोहोचवली आहे. आता भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस पक्ष शहीद करकरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असल्याचे ते म्हणाले.

भाजपाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांना उमेदवारी देवून आतंकवादाला समर्थन दिले आहे हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रुपाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप आतंकवादाशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी माझ्या शापाने देशद्रोही हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजपाच्या माध्यमातून शहींदाचा अपमान करण्याचे काम केले जात आहे. जसे मोदी स्क्रीनवर स्क्रीप्ट वाचून बोलतात. त्याप्रमाणे साध्वी यांना भाजपकडून स्क्रीप्ट लिहून देण्यात आली होती असा आरोप करतानाच भाजपने जिवंतपणी हेमंत करकरे यांच्यावर खोटे आरोप केले आणि शहीद झाल्यावरही देशद्रोहाचा ठपका ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात ईदच्या एक दिवस अगोदर मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर कितीतरी लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे होता. तपासात मोटारसायकल ही साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांची होती हे निष्पन्न झाले होते. अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवाई करण्यात आल्याचे करकरे यांनी समोर आणले होते. अभिनव भारतच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही हत्या केली जाणार होती तसा कट उघड झाला होता. त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष राहिलेले राजनाथ सिंह यांनी तत्कालीन सरकारकडे पत्र लिहून या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

साध्वी प्रज्ञासिंग यांना मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक झाल्यावर करकरे यांच्याबाबत संशय व्यक्त करण्यात येवू लागला होता. मुंबईमध्ये २६ /११ झाले त्याच्या एकदिवस आधी करकरे यांना पीएमओ ऑफिसला बोलावून घेतले होते. त्यानंतर २६ /११ च्या हल्ल्यात करकरे शहीद झाले. साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर या जामीनावर सुटल्या आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांना उमेदवारी देवून आतंकवादाला खतपाणी घातल्याचा आरोप ही त्यांनी केला.

भाजप हेमंत करकरे यांचा देशद्रोही बोलून अपमान करत आहे. त्यामुळे या सरकारला आणि भाजपाला नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे यांना जनताच पराभूत करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे वीरपुत्र शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूरचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही. महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मोदी शाह यांना आनंद होत असेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवालही केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *