मुंबईः प्रतिनिधी
गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके व अवधूत वाघ उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, भाजपाने राज्यातील जवळजवळ सर्व बूथमध्ये मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. ‘वन बूथ ट्वेंटी फाईव्ह यूथ’ ही योजना अंमलात आणली आहे. निवडणूक यादीतील एकेका पानाची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली आहे. भाजपा आगामी निवडणूक संघटनात्मक बळावर जिंकेल.
आगामी निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनाही साथ देईल अशी आशा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांमध्ये बिलकूल तथ्य नाही. राफेलविषयी झालेला करार भारत व फ्रान्स या दोन देशांच्या सरकार दरम्यान झाला होता. त्यामध्ये कंपनीचा काही संबंध नव्हता. या प्रकरणात कसलीही देवाणघेवाण झाली नसून काँग्रेसच्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाही. या विषयी काँग्रेस पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
Tags bjp president raosaheb danave
Check Also
मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही
लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …