राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वा विरोधात त्यांचेच पुतणे तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपा-प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत सहभागी झाली. आतापर्यंत शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भूमिका मांडली. परंतु ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जावे की अजित पवार यांच्या गटासोबत जावे या संभ्रमावस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा गोंधळ उडाल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार यांनी नियुक्त केलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमच्यासोबत १९-२० आमदार असल्याचे सांगितले.
मात्र काहीही करून या सत्तासोपनाला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पाठिंबा मिळवायचाच या हेतूने काल रविवारी १६ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह गटाचे नेते आणि मंत्री पदाची शपथ घेतलेले ९ मंत्री हे अचानक मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथील शरद पवार यांच्या कार्यालयास भेट देत जवळपास ४५ मिनिटाहून अधिक काळ शरद पवार यांना आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमचे मार्गदर्शन आणि आर्शिवाद द्यावी अशी आग्रही मागणी केली. मात्र शरद पवार यांनी अजित पवार गटाला कोणतेच उत्तर दिले नाही. उलट त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले.
त्यानंतर रात्रीत काही तरी निर्णय होईल आणि बंडखोरांच्या गटाला पाठिंबा असल्याचे शरद पवार हे जाहिर करतील अशी आशा अजित पवार यांच्या गटाला होती. मात्र आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ८ मंत्री आणि अन्य काही दोन-चार आमदार हे सत्ताधाऱ्यांसाठी असलेल्या बाकावर जाऊन बसले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांचे कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने त्यांनी विरोधी बाकावरील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस सदस्यांसाठी असलेल्या विरोधी बाकावर जाऊन बसले. विधिमंडळ सचिवालयानेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसन व्यवस्था त्याच पध्दतीने केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्याबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन्ही गटांना तशी मान्यताही दिली नाही. त्यामुळे सभागृहाच्या सांसदीय नियमानुसार कोणत्याही गटाला मान्यता मिळाली नसल्याने विरोधी पक्षातील काही जण सत्ताधाऱ्यांसोबत तर काही जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाकीच्या आमदारांसोबत विरोधकांच्या बाकावर बसल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जर अजित पवार यांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर पाठिंबा दिला. तर पक्ष म्हणून अजित पवार यांच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता मिळेल. आणि आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट म्हणून ओळखले जाणार नाही. जर तशी ओळख दिली तर अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेले सदस्य आमादार म्हणून अपात्र ठरतील. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कायदेशीरदृष्ट्या अजित पवार गटाच्या मंत्री अपात्र ठरतील, जर राजीनामा दिला नसेल तर. त्यामुळे विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या समर्थक आमदारांनी उघड भूमिका घेण्याचे टाळले. त्यामुळे काही निवडक दोन्ही बाजूचे समर्थक आमदार कमी प्रमाणात उपस्थित होते. तर जवळपास २८ आमदारांनी दोन्ही गटांच्या बाजूने भूमिका घेण्याऐवजी तटस्थ राहण्याचा निर्णय घेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथील शरद पवार यांच्या कार्यालयाकडे गेल्याचे दिसून आले.
विधानसभेत शरद पवार गटाचे -जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा, रोहित पवार, राजेश टोपे, अशोक पवार, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, मानसी पवार, अशोक पवार, जितेंद्र आव्हाड हे विरोधी बाकावर बसले होते.
तर सत्ताधारी बाकावर अजित पवार गटासोबत-८ मंत्री अधिक बबनराव शिंदे, प्रकाश सोळंखे, सरोज अहिर, सुनिल शेळके, इंद्रनील नाईक, किरण महामाटे उपस्थित होते.