शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्यानंतर या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचा आरोप केला. त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यात आज शरद पवारांनीही वंचित बहुजन आघाडीबाबत कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत विधान केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या घडामोडी एकीकडे सुरू असताना प्रकाश आंबेडकरांचं एक मोठं विधान केले.
शिवसेनेसोबत तुम्ही युती केल्यापासून मागील काही दिवसांपासून काही खटके उडताना दिसत आहेत, काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याकडे आपण कसं पाहता? या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, प्रश्न तो नाही, प्रश्न असा आहे की माझी युती शिवसेनेबरोबरची आहे आणि ती कायम आहे. त्यामुळे मी तिथपर्यंतच मर्यादित आहे आणि मला इतराचं काही देणंघेणं नाही असे स्पष्ट करत शरद पवारांच्या वक्तव्यावर अधिक बोलण्याचे टाळले.
महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही का? याप्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आबंडकरांनी सांगितलं की, तो मुद्दा मी ज्यावेळी स्पष्ट करायचा तेव्हा मी करेन, आता मी काही त्यावर बोलत नाही असे सांगत महाविकास आघाडीत जाणार की नाही याबाबत आणखी भाष्य करण्याचे प्रकाश आंबेडकर यांनी टाळले.
याचबरोबर संजय राऊतांकडून करण्यात आलेल्या टिप्पणीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला जे बोलयाचं होतं ते मी बोललो आहे. माझ्या पक्षाने काय बोलवं हे माझा पक्ष ठरवतो. आमच्या दृष्टीने जे आम्हाला मांडायचं होतं, ते मांडून आमचं झालेलं आहे. पुढचा काळ जसा जाईल त्यानुसार आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत राहू असे सांगितले.