काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मच्छु नदीवरील झुलता पूल नव्याने उद्घाटन केल्यानंतर कोसळून १४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा दुर्घटनांवरून राजकारण काँग्रेस करू इच्छित नाही असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. तसेच इतर राजकिय पक्षांनीही याबाबत समंज्यसपणा दाखविला. मात्र सोशल मिडीयावर पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओतील मोदींच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. आज शिबिरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुजरात निडवणुकीवरून पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये मागे एकदा पूल पडला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘पूल पडणे हा राज्यातील सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत आहे’. जर हा सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत असेल, तर गुजरातमध्ये नुकताच मोरबी येथील पूल कोळसला आहे. मग हा ईश्वरीय संकेत गुजरातमध्ये मिळाला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही, असा खोचक टोला लगावला.
तसेच राज्यात नवं सरकार आले आहे. नव्या नवलाईचे दिवस आहेत. आमची काही तक्रार नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना चहा घेता का? असं विचारणारा आणि त्याने नाही म्हटल्यावर दारू घेता का? असे विचारणारा मंत्री या सरकारमध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणत्या स्थरावर गेलेलं आहे हे लोकांना लक्षात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
अंधेरी पोटनिडवणुकीत भाजपाने माघार घेतल्यावरून टीका करताना जयंत पाटील म्हणाले, नुकतीच अंधेरीची पोटनिवडणूक झाली. या निडणुकीत भाजपावर माघार घेण्याची नामुष्की ओढवली. त्याला त्यांनी ‘महाराष्ट्राची संस्कृती’चे नाव दिले. मग ही संस्कृती कोल्हापूर आणि पंढरपूरच्या निवडणुकीत कुठं गेली होती? असा प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला. सोयीचं असेल तसं राजकारण करायचं आणि आपण बोललेलं वाजतं हा आत्मविश्वास असणाऱ्या लोकांबरोबर आमची लढाई आहे असा इशाराही भाजपाला दिला.
राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात जिथे-जिथे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे, तिथे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.