गावांत कोरोनाची बातमी अचानक गायब झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना खूप काहीतरी तूटल्या सारखं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीची सवय लागली आणि ती सवय अचानक थांबली की मेंदू सैरभैर होतो, तसं गाववाल्यांच झालं. अचानक कोरोनाची बातमी गेल्यापासून लोकांच्या घशाखाली घास उतरे ना. कोरोना अचानक नाहीसा झाल्यापासून. लोक बिंधास्त तालुक्याला जाऊ लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांच्या घरात चहापाणी करू लागले. एकंदरीत सगळं काही चंगासी होऊन गेलं. गावांत चावडीवर बसून आता एकच चर्चा सुशांत सिंग राजपुत. अनिल हा गावाचा खबरी माणूस चुली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या खाजगी बातम्या त्याला दिवसभरात कोण कुठून पोहोचवायचा हे तोच जाणे. त्याच्या बऱ्यापैकी बातम्या खऱ्या असायच्या ज्या नसायच्या त्या गाववाल्याना खऱ्या वाटायच्या. नंतर नंतर हळूहळू सुशांत म्हणून लोकांच्या जिभेवर नाव फिरू लागलं. त्याला नंतर सिंग राजपुत हे नावं अगदी लहान पोरापर्यंत अलगद पोहोचलं. गावातल्या बायानी जुनी रिपीट टेलिकास्ट पवित्र रिश्ता बघणं सोडलं. माझ्या नवऱ्याची बायको पासून ते अगदी अंग्गबाई सासूबाईचे ही एपिसोड सोडून बातम्यामधून सुशांतसिंगची मर्डर मिस्ट्री पाहण्यात इंटरेस्ट वाटू लागला. नवीन नवीन कहाणीत ट्विस्ट येऊ लागला. लोकांना आता ती एक थ्रीलर, सस्पेन्स सिरीयलप्रमाणे वाटू लागली. आणि या सगळ्याची समीक्षा चावडीवर बसून होऊ लागली.
नेहमी नवा ट्वीस्ट येऊ लागला. अॅडर्व्हाटाईज सारंख्या आल्या बातम्या तर गलवान खोऱ्यातल्या, कोरोनाच्या अथवा दरड कोसळून किती घर जमीनदोस्त झाली, पुरात किती लोकं मेली, कोरोनाचा उच्चांक फक्त स्क्रोल मध्ये येऊ लागला. चावडीवर सुद्धा एकच चर्चा असायची ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतचा मारेकरी भेटला पाहिजे. एक-दोघांनी तर हद्द केली ते म्हणाले की, आपण मोर्चाच काढूया. या सगळ्या चर्चांना उधाण आलेला असतानाच शेजारच्या गावातून आलेल्या मंग्याने खबर सांगितली “शेजारच्या गावात एक घटना घडलीय, एक दलित मुलगा आपल्या नव्या कोऱ्या बुलेटवर बसून मिशी पहात होता, तर वरच्या जातीतल्या पोरांना आवडलं नाही. त्यांनी त्याला मारला आणि झाडावर लटकवला. पोलिसांना सांगितल प्रेम प्रकरणात निराशा येऊन फास लावून घेतला. आणि केस क्लोज केलीय. आपल्याला कोणालाच खबर नाही कशाची कशालाच. पोलिसांनीही जास्त ताण घेतला नाही. ”
पक्या म्हणाला “तो मरूदे आज दाखवणार हायत सुशांत सिंगचं तिसऱ्याच पोरीशी लफड होतं ते, इतक्यात झोल्या तिकडून रागात रागात आला पक्याने विचारलं “काय रं बावा एवढा गरमा गरम होऊन कुठं चाललास? झोल्या ” बायकोन डोका फिरवलनं, आत्ता माझ्या नवऱ्याची बायको बघायचंय म्हणते आज गुरुनाथला पिंकी भेटायला येणारे आणि पिंकी सौमित्र बनणारे.” आता सुशांत सिंगचा पण त्याचं टायमाला दाखवणार होते. मग काय ती चॅनेल बदलायला तयार नाही तर आलो रिमोट फोडून. पम्या समाजिक भान जपता आलं पाहिजे म्हणून मोबाईलवर दाभोलकरांची एक मुलाखत ऐकत सुशांतचा आजचा ट्विस्ट पाहायला गेला. आज नवा ट्विस्ट पाहता पाहता ” प्रेमाच्या निराशेमुळे एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या अधिक तपास सुरु आहे ” एक स्क्रोल येऊन गेला कोणाच्या लक्षात ही आला नाही. न्यूज वाल्यांनी लोकांच्या मेंदूत अजून एक ट्विस्टचा कोयंडा घातला.
Khup chan vastav Mandalay lekhakane.