Breaking News

मुंबईसाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे कोरोना चाचण्या वाढवा, आयुक्त चहल यांचे निर्देश

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले.

आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज प्रशासनाची बैठक घेतली होती यावेळी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. चहल याप्रसंगी म्हणाले की, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच, आता पावसाळादेखील सुरु होणार असून पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.

तर कोविड आणि मॉन्सून या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा असली तरी त्याचा नियमितपणे आढावा घेणे आणि यंत्रणा सुसज्ज राखणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे मुंबई महानगरात सध्या होत असलेली कोविड चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजार इतकी असून ती प्रतिदिन ३० ते ४० हजार पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल तसेच सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी असे निर्देशही त्यांनी दिले.

संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करन्यात यावी तर  ज्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील, त्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करावी. तसेच त्या इमारती / गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर संसर्गमुक्त होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे व  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा संचालकांसमवेत बैठक घेतली आहे. या सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि वाढीव संख्येने चाचण्या करण्याची क्षमता राखावी, अशा सूचना पुन्हा एकदा देण्यात याव्यात तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोणत्याही रुग्णाला कोविड बाधित असल्याचा अहवाल परस्पर देऊ नये. दैनंदिन कोविड बाधितांचे सर्व अहवाल फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठवावेत. या बाबीचे उल्‍लंघन केल्यास संबंधित वैद्यकीय प्रयोगशाळेवर सक्त कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये / शौचालयांमध्ये दिवसातून किमान ५ वेळा जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे. जेणेकरुन, कोविडसह पावसाळी आजारांचा फैलाव रोखता येईल. या उपाययोजनांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाईल. तर १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे. व वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकले जाणाऱ्या सेल्फ टेस्टिंग कोविड कीटची आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात यावी.

दरम्यान पावसाळ्यात रस्त्यांवर होणारे खड्डे वेळेत भरले जावेत, यासाठी विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नागरी समस्यांची दखल घेतली जावी. त्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) व उप आयुक्त (पायाभूत सुविघा) यांनी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करावी.  तर  पावसाळा सुरु झाल्यानंतर, सर्व उपाययोजनांची प्रत्यक्ष व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे, तसेच पूरस्थिती अथवा नागरिकांना अडचणीची ठरु शकेल, अशी कोणतीही स्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेची सर्व संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरुन कार्यान्वित आहे, याची खात्री करावी. असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.

पुढील दोन आठवडे महत्वाचे- डॉ संजय ओक
पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्र टास्क प्रमुख डॉ संजय ओक म्हणाले आहेत तर बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोविड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले असले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री प्रारंभापासून आजही नियमितपणे मुखपट्टी (मास्क) चा उपयोग करतात. त्याचे पालन नागरिकांनी देखील करणे आवश्यक आहे. कोविड सोबत पावसाळ्यात येणारे जलजन्य आजारांचे आव्हान देखील आपल्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *