नुकतेच बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीत समझौता झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. नेमक्या त्याच कालावधीत बीआरएस, एमआयएम आणि महादेव जानकर यांनीही रासपची ऑफर दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या नाट्यानंतर राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री झालेले धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर पुन्हा बहिणीच्या घरी गेल्याची माहिती पुढे आली. याशिवाय पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरल्यानंतर अखेर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना म्हणाल्या मी भाजपा मध्येच राहणार असल्याचे सांगत माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांवर भाजपा पक्षानेही कधी तरी भूमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून एक गट सत्तेत दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे निराश असल्याची चर्चा होती.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला मागच्या काही दिवसांपासून सतत कॉल येत आहेत. २०१९ मध्ये मी भाजपाची उमेदवार होते आणि माझा पराभव झाला. ‘मी मागच्या चार वर्षापासून नाराज आहे, त्याचबरोबर पक्ष सोडून जाणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. काँग्रेसचे नेते सुध्दा म्हणत आहेत की, पंकजा मुंडे आल्या तर येऊ द्या, हे सगळं कोण पसरवत आहे ?’ या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण दिलं.
तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे. मी गेली २० वर्ष राजकारणात काम करीत आहे. त्याचबरोबर माझ्याबाबत मुद्दाम चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू. माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत, मला पराभव पत्करावा लागला आहे. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटलेले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही असेही स्पष्ट केले.
मी याच्या अगोदर सुध्दा म्हणाले होते की, राजकारणात जर चुकीची गोष्ट करावी लागली, तर मी राजकारण सोडेन. मी दोन महिन्यांची सुट्टी घेत आहे. मला अंतर्मुख व्हायची गरज आहे असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या, विधान परिषदेची निवडणूक असो किंवा राज्यसभेची निवडणूक असो पण प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होते. विधान परिषदेच्या वेळी मला पक्षाकडून फोन आला. पक्षाने सांगितले तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. मी फॉर्म भरण्याच्या दिवशी मुंबईत आले तर मला सकाळी दोन तास आधी सांगण्यात आलं की फॉर्म भरू नका आता त्याची गरज नाही. त्यामुळे या चर्चांबाबत पक्षानंही बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटल्याची खोटी बातमी देणाऱ्या वाहिनीच्या विरोधात मी न्यायालयात दावा करणार असल्याचा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला.