Breaking News

आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठ सलग चवथ्या वर्षी प्रथम आविष्कार संशोधन स्पर्धेत मिळविला पहिला क्रमांक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १२ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ७९ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करून १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई करत आविष्कार संशोधन स्पर्धेवर मुंबई विद्यापीठाची सलग चौथ्या वर्षी विजयी मोहोर उमटली आहे.

या संशोधन महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठ या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला; वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी; मुलभूत शास्त्रे; शेती व पशू संवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. यामध्ये मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या, भाषा आणि कला या प्रवर्गात ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी या प्रवर्गात १ सुवर्ण, मुलभूत शास्त्रे या प्रवर्गात १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, शेती व पशू संवर्धन या प्रवर्गात ३ सुवर्ण, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या प्रवर्गात ३ सुवर्ण आणि २ रौप्य, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गात १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावले. तर मानव्यविद्या भाषा आणि कला; शेती व पशुसंवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र या चार प्रवर्गात विजेतेपद मिळाले.

संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या कल्पकतेतून आविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, अविष्कार स्पर्धेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिनाक्षी गुरव यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्यांचा गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या या नेत्रदिपक कामगिरीसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यावेळी बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के म्हणाले, “संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सलग चौथ्या वर्षी केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज राज्य स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे, हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविण्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. संशोधनातून समाजजीवन सुसह्य व्हावे यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना द्यावी. ”

या संपूर्ण आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. भूषण लांगी आणि डॉ. रूपा राव यांनी काम पाहिले. तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव, डॉ. किशोरी भगत, डॉ. मनीष देशमुख, डॉ. राहुल शेट्टी, डॉ. वैशाली निरमळकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. अनुराधा मुजुमदार, डॉ. तब्बस्सुम खान, श्रीमती प्रज्ञा कोरलेकर, डॉ. दिलीप मोटवाणी आणि डॉ. अभिजित कदम यांनी काम पाहिले. या स्पर्धेत मेण्डोंका कर्लिशा, शेख झुहा, शेख हन्नत, पांडे रितेश, यज्ञेश हरड, वरुडे साहिल, रोशन चौधरी, वैशाली निरगुडे, दुबे शिवम, शुभम सावंत, संतोष जगडाळे, आणि शुभम संसारे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक नंदिनी पटेल, मानसी दमानी, विशाल पेडणेकर, स्वराज मिश्रा आणि रश्मी वाणी यांना प्रदान करण्यात आले. तर कांचन माळी आणि संध्या जाधव यांना कांस्य पदक मिळाले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *