Breaking News

म्हाडाच्या ट्रांझीट कॅम्पमध्ये घुसखोरी झाली तर रेंट कलेक्टर घरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबईत असलेल्या संक्रमण शिबीरात जे घुसखोर बेकायदेशीर वास्तव्यास आहेत, त्यांची चौकशी सुरू केली असून त्यांना बाहेर काढावे लागेल. यापुढे संक्रमण शिबीरात घुसखोर घुसणार नाहीत, यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. घुसखोर आढळल्यास त्याठिकाणच्या रेंट कलेक्टरला घरी बसवले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली.

मुंबई शहरात अनेक मोडकळीस आलेल्या जुन्या व जीर्ण इमारती आहेत. या इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्विकास करण्याची आवश्यकता असून त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी म्हाडाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच पुनर्विकास होत असताना रहिवाश्यांना तात्पुरते निवास देण्यासाठी संक्रमण शिबीरांची संख्या कमी असल्याबाबतची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केली होती. त्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले.

मुंबईतील संक्रमण शिबिरात ३०-४० टक्के घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढावे लागेल. काही घुसखोरांना कालांतराने सरकारनेच मान्यता दिली आहे. पण हे कधीतरी बंद करावे लागेल. याच्यापुढे घुसखोर घुसणार नाहीत यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच सरकारी यंत्रणेचा हात असल्याशिवाय घुसखोर घुसणार नाहीत, असे सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी कडक कारवाईचे आदेश दिले.

म्हाडामध्ये मनुष्यबळ कमी असल्याचा मुद्दा देखील लक्षवेधीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर म्हाडामधील ५२३ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील काळात म्हाडाच्या जागेवर कर्मचारी नाहीत, असे होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच दक्षिण मुंबईत १०० ते २०० वर्ष जुन्या इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती आणि पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी येथील रहिवासी दूर ठिकाणी ट्रान्झिट कँपमध्ये जाणार नाहीत, त्यांची जवळच कुठेतरी व्यवस्था करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने एमएमआर रिजनमध्ये जमीन मिळते का ते पाहून ट्रान्झिस्ट कँप बांधावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्रान्झिट कँपमधील घरे विकणारी एजंटची टोळी कार्यरत असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडला होता. हे टाळण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात फलक लावला जाईल तसेच ट्रान्झिट कँपच्या ठिकाणीही सुरक्षित फलक लावला जाईल. तसेच आतापर्यंत झालेल्या फसवणूक प्रकरणात पुढील दोन-तीन महिन्यांत कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Check Also

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *