पाच राज्यातील निवडणूकीनंतर पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून आज काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत आई-बाप काढायचे नाहीत असा सज्जड दमच भरला.
लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात बोलताना म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये धर कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलकडून वाईट पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी त्या इतिहासामध्ये अडकण्याऐवजी आता आपण उपाययोजना केल्या पाहिजेत. दरम्यानच्या चर्चेत सुळे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यामध्ये शाब्दिक-बाचाबाची झाली.
सुप्रिया सुळे या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन बोलत असताना जम्मू-काश्मीर मधील शैक्षणिक क्षेत्रावर भाष्य करत होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये पाच हजार मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलला सरकारकडून नोटीसा पाठवल्या जात असून त्यांना त्रास दिला जातोय. अशा नोटीसा पाठवून तुम्ही त्या राज्यातील मुलांचे भले करत आहात का? किती दिवस आपण होऊन गेलेल्या घटनांबद्दल बोलणार असा सवाल करत आपण इतिहासात अडकून न राहता भविष्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
आपल्याला कोणाकडून काय मिळाले, यापेक्षा आपण काय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून फारसा बदल घडलेला नाही. यावेळी त्यांनी त्यांच्या आधी भाषणामध्ये काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जितेंद्र सिंह यांना मागील काळात किती हॉटेल्स तिथे बांधले काय सुविधा पुरवल्या अशी विचारणा केली. माझे आधीचं भाषण तुम्ही ऐकयला हवे होते असा खोचक सूचनाही त्यांनी मंत्र्यांना केली.
यानंतर जुन्या भाषणाचा संदर्भ आल्याने सुप्रिया सुळे ज्यांना प्रश्न विचारत होत्या ते जिंतेद्र सिंह यांनी जागेवरुन उठून म्हणाले की, आम्ही नाही सांगणार आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केले असं त्यांना बोलताना मी ऐकलं होते. नाही सांगायचं तर नका सांगू पण तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात की आज संसदेमध्ये उभ्या आहात. दुसऱ्यांकडून आपल्याला काय मिळालं काय नाही हे आपण विसरु शकत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या आई-वडिलांमुळेच इथे आहात असे खोचक उत्तर दिले.
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी घराणेशाहीला कधीच काही बोलले नाही. मी नेहमीच त्याबद्दल चांगलं बोलले आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर आमच्याशी काय अडचण आहे तुम्हाला? असा थेट खोचक प्रश्न जितेंद्र सिंह यांना विचारला.
आई-वडिलांबद्दल सोडून काहीही बोलावे. आई-बाप काढायचे नाहीत असेही त्यांनी यावेळी जितेंद्र सिंह यांना सुणावले.
त्यावर जितेंद्र सिंह यांनी वारसा विसरणे शक्य नाही असं मी म्हणत होतो. मग तो देशाचा असो, समाजाचा असो. मी पर्सनल आयुष्यावर काहीही बोललो नाही असा खुलासाही केला.