एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील त्रिवेणी नगर येथील जाहिर सभेत बोलताना थेट अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहिर करून केली. तसेच प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराचे डिपॉजीट जप्त करा असे आवाहन करत त्याची जबाबदारी तुम्हा शिवसैनिकांवर राहिल असेही जाहिर केले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून परतलेले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ईशान्य मुंबईतील मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवित म्हणाले की, मी मध्यंतरी जरा गुजरातवर बोललो. तर देवेंद्र फडणवीस माझ्या टीकेवर म्हणाले की गुजरात काही पाकिस्तानात नाही. मग गुजरात जर पाकिस्तानात नाही तर काय महाराष्ट्र पाकिस्तानात आहे का असा सवाल करत देशाचे पंतप्रधान प्रत्येक वेळी महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रत्येक प्रकल्प हा गुजरात राज्यात नेत आहेत. सगळे प्रकल्प जर गुजरातला नेता मग महाराष्ट्र काय पाकिस्तानात आहे म्हणून नेता का अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा तो जनसंघ आणि भाजपा कधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होता का ? की कधी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तरी होता का? पण आता दुसऱ्यांच्या मेहनतीतून तयार झालेल्या गोष्टी ओरबाडून घेण्यासाठी ते पुढे येत आहेत. केवळ भाजपावाले स्वतःला सत्तेत बसता यावे म्हणून याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड करत आहेत. त्यासाठी सध्या सत्ताधाऱ्यांमधील जो कोण आहे तो आपल्या फुकटच्या २५ पोळ्या हाणून आणि त्याच्या बायकोसोबत भांडण करून पुन्हा दुसऱ्या पंक्तीला जेवायला सगळ्यात पुढे असतात. त्यासाठी त्यांची भांडणे होतात असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, जर तुम्हाला देशाची सत्ताच हवी आहे ना, आणि देशातील सर्व निवडणूका तुम्हाला एकदाच जिंकून नंतर सत्तेची फळं चाखायची आहे तर घ्या तुमचं ते वन नेशन वन इलेक्शन देशाच्या लोकसभेच्या निवडणूकीबरोबर महापालिकेच्या निवडणूकाही घ्या मग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शिवसेनेची ताकद. त्या निवडणूकीच्या धबडग्यात आमच्या मशालीची धग किती पोळेल हे बघाच असे आव्हान भाजपाला देत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर चालवत आहात. कोविड काळात त्याच महापालिकेचे कमिश्नर एक्बालसिंह चहल यांनी चांगले काम केले. परंतु आता भ्रष्ट लोक राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असल्याने त्यांच्याकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला चहल यांना मुकाट साथ द्यावी लागत आहे असे सांगत भाजपा आणि मिंदे गटावर टीकाही केली.
शाखाभेट । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । त्रिवेणी नगर – LIVE https://t.co/eorWfykj34
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 10, 2024