मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आंतरजिल्हा एसटी प्रवासावर घालण्यात आलेली बंदी पुढील आठवड्यात उठविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील चार-पाच महिने इच्छा असूनही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता आले नाही अशांना आता दिलासा मिळणार असून याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
नुकतीच आंतरजिल्हा एसटी प्रवासी सेवा सुरु करण्यासंदर्भात मदत व पुर्नवसन विभाग आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत या गोष्टीवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आंतरजिल्हा प्रवास सुरु करण्याबाबत एकमत झाले असून पुढील आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यातील सध्या शालेय शिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. ते तसेच यापुढे चालू राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणारे कोचिंग क्लासेस आणि स्पर्धात्मक परिक्षेची स्पर्धा परिक्षा केंद्रे मार्गदर्शक तत्वे जाहीर करून सुरु करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईची जीवनवाहीनी असलेल्या लोकल रेल्वेसेवेबाबतही मुख्यमंत्र्यांकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.