मुंबई : प्रतिनिधी
रंगभूमीवरील नाट्यकलाकृतींसोबत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण कारण्यात वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) यशस्वी ठरला आहे. आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसोबत संघर्ष करीत आपला ठसा उमटवीत यशस्वी होत प्रचंड लोकप्रियता मिळविली. लोकप्रिय गीतकार, संगीतकार, गायकांनी निर्माण केलेल्या अवीटगोडीच्या अजरामर लोकप्रिय गाण्यांवर सादर होणाऱ्या या कलाप्रकारात विविध बदल करुन सादर केलेल्या गाण्यांनी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना कायम भुरळ घातली आहे.
गायक – संगीतकारांच्या गाजलेल्या गाण्यांचे पुन्हा पुन्हा सादरीकरण करून त्यांच्या लोकप्रियेतेत वाढ करण्याचे काम वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा)ने केले आहे. त्यांनी लोकप्रिय गाण्यांना थेट प्रेक्षकांच्या काळजात पोहचवीत त्या त्या गायक-संगीतकाराची लोकप्रियेता सातत्याने वाढवलीच केली आहे. वाद्यवृंदाची लोकप्रियता पाहून गायक – संगीतकारांनीही अश्या कार्यक्रमांतून हजेरी लाऊन ऑर्केस्ट्राचे महत्व आबादित असल्याचे सिद्ध केले आहे. रंगभूमीवर गली ४०–४५ वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबविणारे रत्नाकर पिळणकर व कमलाकर बनसोडे यांच्या नव्याने स्थापन केलेल्या ”प्रतिष्ठा निर्मित” या संस्थेने आपले पुढचे पाऊल टाकले असून ‘चलती का नाम गाना’ च्या यशानंतर त्यांचा दुसरा ऑर्केस्ट्रा रंगभूमीवर येत आहे. स्व. लोकप्रिय गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची व गाण्याची स्फूर्ती घेऊन नावलौकिकास पात्र ठरलेल्या अमीतकुमार, विनोद राठोड़, कुमार सानू, जॉली मुखर्जी, अभिजीत व बाबुल सुप्रियो यांच्या सुपरहिट गाण्यांच्या कार्यक्रमाची निर्मिती रत्नाकर पिळणकर यांनी केली आहे. ‘व्हाईस ऑफ किशोर कुमार’ असा आपला ठसा उमटविणारा आणि तरुण तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला गायक आलोक काटदरे ही सर्व गाणी सादर करणार असून रवि-राजू आणि संजय मराठे त्याचे संगीत संयोजक आहेत. तर बी. कमलाकर सहनिवेदक आहेत. तसेच ‘हिट बीट्स’ च्या सहयोगाने सादर होत असलेल्या या कार्यक्रमात नम्रता थोतम, मानसी विंझे, नीरजा विंझे आणि गीता अय्यर या नव्या सुरील्या गायिकांची ओळख रसिकांना होणार असून शुक्रवार दिनांक २३ मार्च २०१८ रोजी रात्रौ ८ वाजता शिवाजी मंदिर, दादर (प) येथे शुभारंभाचा प्रयोग केला जाणार आहे.