मुंबई : प्रतिनिधी
पालघर पोटनिवडणूकीत सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर त्यास काही तासांचा अवधी उलटून जात नाही. तोच भाजपकडून याबाबतचा खुलासा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केले.
निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला जाहीरनामा सांगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मतदारसंघातील प्रचारात भाजपाच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे मांडले. या मुद्द्यांचे सूतोवाच त्यांनी निवडणुकीपूर्वीही केले आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची काँग्रेस उमेदवाराच्या प्रतिनिधीची तक्रार चुकीची असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
ते म्हणाले की, पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जनतेच्या प्रतिसादावरून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. मुख्यमंत्र्यांच्या सभेत याची खात्री पटली. त्यामुळे निराश झालेले विरोधक निरर्थक मुद्दे काढून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मतदार कोणत्याही प्रकारे विचलित होणार नाहीत व विकासाच्या मुद्द्यावरून भाजपालाच पाठिंबा देतील.