मुंबईः विशेष प्रतिनिधी
दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आदी उपस्थित होते.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपन्न झाल्यानंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य कारभार हाकण्याच्यादृष्टीने सर्वप्रथम राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या आढाव्या दरम्यान कोणती विकास कामांची प्राथमिकता आधी आहे आणि कोणत्या कामांची नंतर आहे. याबाबतची माहिती घेवून त्यानुसार त्याचा अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्यपालांनी मदत जाहीर केलेली आहे. मात्र त्याहून अधिक मदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीचा निधी देण्यासाठी राज्याला सहकार्य आणि सहाय्य करायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यासाठी वेळ पडल्यास भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सोबत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यमान परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळात सात जण असून कामकाजाला सुरुवात करण्यासाठी खात्यांचे वाटप करण्यात येईल. तसेच आम्ही तिन्ही पक्ष लवकरच याबाबत एक बैठक घेवून अंतिम खाते वाटप करू आणि त्यानंतर ते जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आपल्याला आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भावाभावाच्या नात्याबद्दल बोलले. तसेच हे नाते टीकावे अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.
Tags chhagan bhujabal cm uddhav thackeray diwakar raute ekanath shinde pm narendra modi subhash desai
Check Also
विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…
गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील …