Breaking News

भिलारगावच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी

मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी  केली. मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.

विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज मान्यवरांना देण्यात येणारा हा केवळ पुरस्कार नसून मराठी भाषेची सेवा केल्याबद्दल आणि अक्षरधनाची जपणूक केल्याबद्दल ऋण व्यक्त केले जात आहेत. साहित्यिक केवळ लेखन करत नाहीत. तर ते आयुष्याची गाडी रुळावर ठेवतात असता उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना प्रमुख म्हणत, एका एका अक्षरातून शब्द बनतो. मग त्या शब्दांचे मंत्रही होतात, ओव्याही होतात आणि शिव्याही होतात. ज्याच्या-त्याच्यावर भाषेचे कोणते संस्कार होतात, त्यातून त्याची भाषा विकसित होत असते. भाषा जपणे म्हणजे संस्कृतीचे जतन करणे आहे.

परदेशातील मराठी मंडळातही मराठी भाषेचे, मातृ भूमीचे प्रेम आणि ओढ असल्याचे जाणवते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या उक्तीप्रमाणे ही मंडळी मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन केले जाते. मुख्यमंत्र्यांनी फिलाडेल्फीया येथील अशाच एका कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची आठवण यावेळी सांगितली.

मुख्यमंत्र्यांचे वाचनसाहित्य प्रेम

भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओघवत्या शैलीत आपण वेळ मिळेल, त्यावेळी काही-ना-काही वाचत असतो असे नमूद करतानाच पु.ल. देशपांडे यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत शब्दांची विसंगती, कवीवर्य वि.दा. करंदीकर यांच्या कविता शालेय जीवनात तोंडपाठ असल्याच्या आठवणी, कवी मंगेश पाडगांवकर यांच्याशी झालेला संवाद, कवी वा.रा. कांत यांची रुग्णालयातील भेट, कवयित्री शांता शेळके यांच्या म्हणी, ओव्या, लोकगीतांविषयीचे साहित्य, बहिणा बाईंची गाणी यांचाही आवर्जून उल्लेख केला. याबरोबरच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाच्या सीडीज यांच्यासह अनेक पुस्तकांचा, विविध साहित्यकृतींच्या सीडीज यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अमुल्य ठेवा दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.

शासकीय भाषा सोपी करणार – सुभाष देसाई

शासकीय वापरातील मराठी शब्दांना सोपे पर्यायी शब्द शोधून त्यांना वापरात आणण्यात येतील असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  जगभरातील मराठी कुटुंबांना एकत्रित जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय भाषा संवर्धन केंद्रांचे जाळे तयार करण्यात येत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

यावेळी मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मराठीच्या बोलींच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला हाती

राज्य मराठी विकास संस्था आणि पुणे येथील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन’ ह्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रभर मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण तसंच प्रतिमांकन (डिजिटायझेशन) आणि त्यातील व्याकरणिक विशेषांचे नकाशांच्या स्वरूपात आलेखन (मॅपिंग) करण्यात येत आहे.

ऐरोली येथे होणार मराठी भाषा उपकेंद्र

मराठी भाषा विभागाने ऐरोली (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तांत्रिक सहकार्याने मराठी भाषा उपकेंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. मराठी भाषा विभागाच्या अधीनस्थ विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कामात समन्वय राहावा यासाठी यापैकी काही कार्यालये एकाच इमारतीत असावीत हा यामागील उद्देश आहे.

या उपकेंद्रामध्ये ॲम्पिथिएटर, बालोद्यान, आनंदयात्रा, उपाहारगृह, ग्रंथालय, प्रदर्शनकक्ष, परीक्षाकेंद्र, वातानुकूलित प्रेक्षागृह असणार आहे.

पुस्तकांचे गाव योजनेचा होणार विस्तार: अक्षरयात्रा”

पस्तीस दालनांमध्ये विविध साहित्यप्रकारांची सुमारे पस्तीस हजार पुस्तके असणारे भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव. राज्य मराठी विकास संस्थेकडून ही योजना ‘पुस्तकांचं गाव विस्तार योजना : अक्षरयात्रा’ या नावाने विस्तारण्यात येत आहे.

योजनेमध्ये समाविष्ट ठिकाणे :

कोकण विभाग : थिबा पॅलेसरत्नागिरी येथील प्रादेशिक संग्रहालय

पुणे विभाग : ग्रामपंचायत अंकलखोपजिल्हा सांगली येथील कृष्णाकाठचा श्री दत्तमंदिराचा परिसर औदुंबर.

नाशिक विभाग : निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव (बसवंत)

अमरावती विभाग : वर्णमुद्रा प्रकाशन शेगावबुलढाणा

वऱ्हाडी बोलींच्या शब्दकोशांचे प्रकाशन

वऱ्हाडी बोलीच्या शब्दकोशाचे दोन खंड आणि वऱ्हाडी वाक्प्रचार आणि म्हणी यांचे प्रत्येकी एक खंड असे एकूण चार खंड डॉ. विठ्ठल वाघ आणि डॉ. रावसाहेब काळे यांच्याकडून तयार करण्यात आले असून ते राज्य मराठी विकास संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येत आहेत. हे खंड मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाजालावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तकं दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची परंपरा आहे. कोविड-१९सारख्या महासंकटात देखील ही परंपरा खंडित न होऊ देता अत्यंत मौलिक अशा १५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार स्पर्धा

मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषाविभागाद्वारे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात येत आहे. या मंचातर्फे सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून चलचित्र, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी १० मार्च ते १० एप्रिल २०२१ असा असून या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी १ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *