मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष मुंबई आयोजित “रक्षक बंधन” या उपक्रमाचा आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना हेदेखील उपस्थित होते.
“रक्षक बंधन” कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, मिडिया कर्मचारी आदींसाठी प्रत्येक घरातून दोन दोन राख्या आणि कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे जमा करून पोहोचवण्यात येतील. रक्षा बंधनाच्या दिवशी प्रत्येक वॉर्ड मध्ये भाजपातर्फे या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पोलिस स्थानक, स्थानिक रुग्णालय, सफाई चौकी, माध्यमांचे कार्यालय अशा ठिकाणी हा रक्षक बंधन कार्यक्रम करण्यात येईल.
त्याचबरोवबर सीमेवर तैनात जवानांसाठी जनतेच्या कृतज्ञेच्या भावना राखीच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी देखील याच “रक्षक बंधन” राख्या जमा करण्यात येणार आहेत. आज जमा झालेल्या राख्यांचा पहिली पेटी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिकांसाठी लडाखला रवाना करण्यात आली असून जशा राख्या जमा होतील, तशा त्या लडाख येथे पाठविण्यात येणार आहेत. या राख्या जमा करण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये सोसायट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी “रक्षक बंधन” च्या पेट्या भाजपातर्फे ठेवण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी कोविड योद्धे तसेच जवानांसाठी मोठ्या संख्येने प्रत्येक घरातून दोन दोन राख्या या पेट्यांमध्ये जमा कराव्यात असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले.