मुंबईः विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा आणि सोलापूरात केलेल्या घोषणेनुसार राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची आणि अनेकांना घरी बसविल्याशिवाय मी घरी जाणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता पवार यांनी देशाच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ घडविण्यासाच्यादृष्टीने जुळवाजुळव करण्यास सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत असतानाही पवार यांच्या चाणाक्ष राजकिय खेळीने ऐननिवडणूकीच्या काळात शिवसेनेला पध्दतशीरपणे भाजपापासून वेगळी भूमिका मांडण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेनेच आमचं ठरलंय असे जाहीर करूनही उध्दव ठाकरे यांनी सुरुवातीपासून मुख्यमंत्री पदी शिवसैनिकच बसणार असल्याची जाहीर भूमिका घेण्यास सुरुवात केली. ठाकरे यांच्या भूमिकेमागे शरद पवार यांच्या राजकिय डावपेचाची किनार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर तर शरद पवार यांच्या राजकिय डावपेचांना भलतीच धार आली. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेला भाजपापासून पूर्णतः करण्यात पवार यशस्वी झाले. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर आघाडी आणि काँग्रेसचा राज्यात व्यापक असा चेहरा नसणे या दोन्ही गोष्टींचा फायदा शरद पवार यांच्या राजकिय खेळीला पाठबळ देणारा ठरला. तसेच राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेस पक्षाच्या राजकिय निर्णयाची जबाबदारी पवारांच्या हाती आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रसारमाध्यमांनीही भाजपा नेत्यांना सत्ता स्थापनेचा प्रश्न विचारण्याऐवजी शरद पवारांना विचारणा करण्यात येत होती. परंतु पवार यांनी याचे कधीच स्पष्ट उत्तर न देता त्यांनी नेहमी गुढ हास्य करत याबाबतचे स्पष्ट संकेत देण्याचे नेहमीच टाळल्याचे त्यांनी सांगितले.
देशातही भाजपाप्रणित रालोआला स्पष्ट असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रभावळीला मोठा राजकिय धक्का देण्याचे स्पष्ट संकेत पवारांकडून देण्यात आलेले आहे. तसेच देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची काँग्रेससह आघाडी आगामी काळात उभा राहीली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय देशाच्या सामाजिक पटलावर आणि राजकिय पटलावर अनेक सामाजिक चळवळी उभारून भाजपाच्या कट्टर हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि आर्थिक दिवाळखोरीचा बुरखा फाडण्यासाठी रणनीती आखण्यात येत असून या गोष्टी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे सांगत त्याचाच एक प्रयोग शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीतून राज्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Tags amit shah bjp congress narendra modi ncp sharad pawar sonia gandhi
Check Also
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो
देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …