मुंबई : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या वाल्मिकींमुळे माझे व माझ्या पत्नीचे जीवन धोक्यात आल्याची गंभीर बाब भाजपचेच धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेच्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विधानसभेत औचित्याच्या मुद्याच्या आधारे अनिल गोटे यांनी वरील मुद्दा उपस्थित केला.
धुळे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना भाजपने प्रवेश दिला. तसेच या व्यक्तींकडून माझ्याबद्दल आणि माझ्यापत्नीबद्दल आश्लाघ्य भाषा जाणीवपूर्वक वापरण्यात येत आहे. याबाबत आपण हरकत घेतली असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे भाजपमध्ये येणारे वाल्याचे वाल्मिकी होत असल्याचे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे आमदार आणि त्यांच्या पत्नींचे जीवन धोक्यात आले. मात्र त्याबाबत कोणीच कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आमदारच सुरक्षित नाही तिथे त्यांच्या पत्नींचे काय, अशी खंत व्यक्त करत राज्यात निर्माण होत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेची सभागृहाने दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
अनिल गोटे यांच्या आरोपाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल याप्रकरणाची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.